मुंबई : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि बालवयातील आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास येऊन त्यावर योग्य उपचार मिळावेत, यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र संजय श्रीपतराव काटकर यांनी यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समित्या, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समित्या तसेच संबंधित यंत्रणांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
RBSK अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळा, तर शासकीय व निमशासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये जन्मजात दोष, पोषण व सूक्ष्मपोषक घटकांची कमतरता, विकासातील विलंब व अपंगत्व तसेच विविध आजार या चार प्रमुख बाबींची तपासणी केली जाते.
आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पुढील तपासणी, तज्ज्ञ उपचार तसेच संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे कोणताही विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी शाळा आणि आरोग्य यंत्रणांनी योग्य समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपासणीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी, तपासणी झाल्याची खात्री करावी आणि तपासणीदरम्यान आढळलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर आवश्यक संदर्भ सेवा मिळत असल्याची खात्री करावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक बाबींचा वेळोवेळी आढावा घेऊन पालकांचेही आवश्यक सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“निरोगी बालपणासाठी वेळेवर आरोग्य तपासणी आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी होऊन आवश्यक उपचार व संदर्भ सेवा मिळतील, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे.












