वसई: मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात पावसाचा जोर चांगलाच राहिला आहे. या पावसामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. यात धामणी धरण ७५ टक्के तर पेल्हार धरण ८५ टक्के भरले आहे.
वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाअंतर्गत धामणी धरणातून दररोज २०० दशलक्षलीटर पेल्हार मधून १० दशलक्षलीटर आणि उसगाव धरणातून २० दशलक्षलीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून १८० दशलक्षलीटर असा एकूण ४०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा शहरात होतो.मागील काही दिवसांपासून पावसाने पालघर जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने नद्या, धरणे, तलाव या तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः ज्या धरण तलावातून नागरिकांना वर्षभर पाणी पुरवठा केला जातो त्यातील जलसाठा वाढला आहे.
धामणी धरणाची क्षमता ही २७६. ३५ दशलक्ष घनमीटर एवढी असून त्यापैकी २११.८६७ इतका पाणीसाठा म्हणजेच ७५.७६ टक्के इतका म्हणजेच वर्षभर पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे तर पेल्हार धरणाची क्षमता ३.५६ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी ३.०३० इतका पाणीसाठा जमा झाला असून हा साठा २०० दिवस पुरेल इतका आहे. तर उसगाव धरण मात्र अद्यापही ५० टक्के इतकेच भरले असून त्यात केवळ ७० दिवस पुरेल इतका जलसाठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. अजूनही दोन ते तीन महिने पावसाचे आहेत. या कालावधीत चांगला पाऊस झाला तर शहराची पाणी चिंता मिटेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.












