ठाणे : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर अनेकांनी महापालिका निवडणूकांसाठी एकत्र आले आहेत, अशा चर्चा रंगवण्यास सुरुवात केली. परंतू, सरकारने आणलेल्या हिंदी सक्तीचा विषय म्हणून मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. आता, हे प्रेम टिकवायचे की, नाही याबाबत ठाकरे बंधूंनी ठरवायचे आहे, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाळा नांदगावकर ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता. त्यात, सर्वांना राज ठाकरे यांचा स्वभाव माहितच आहे. ते मराठीविषयी कोणतीही तडजोड करत नाहीत. हिंदी सक्तीच्या विषयाला धरुन आम्ही पुढे निघालो आहोत. यात, महापालिका निवडणूकांचा कोणताही विषय नाही. महापालिका निवडणूका अजून खूप लांब आहेत. अद्याप निवडणूकांची तारिख नक्की झालेली नाही. परंतू, विरोधकांचे काम आहे, कोणतेही अर्थ काढायचे. त्यांना कोणी रोखू शकत नाही, असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले.
अविनाश जाधव हा आमचा लढवय्या माणूस आहे. त्याने मिरा भाईंदरमध्ये घेतलेला मोर्चा चुकीचा नव्हता तो योग्यच होता. त्या मोर्चाला रितसर परवानगी दिली असती तर, गोंधळ झाला नसता. आमचे कार्यकर्ते जे काही करत आहेत ते उत्तमप्रकारे करत आहेत. परंतू, कार्यकर्त्यांनी त्यांच्यात असलेली ऊर्जा कुठेही वाया घालवू नये. समाजाच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते ते करा, अन्याय दिसेल तिथे लाथ मारलीच पाहिजे. मात्र, ते करताना आपल्या पक्ष प्रमुखांना ही गोष्ट आवडेल का? ते पक्षाला फायदेशीर आहे का? याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.












