6 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

“झूठ बोले कौवा काटे…”, देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही हवेत बाण…”

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी या संदर्भात आतापर्यंत अनेकदा भाष्य करत वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासांत मतदानाची आकडेवारी वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. यानंतर आता राहुल गांधींनी आणखी एक दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढल्याचा आरोप केला आहे.

तसेच मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…’, असं म्हणत तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?

“झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…, राहुल गांधी, महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे तुमचं दुःख दिवसेंदिवस वाढत आहे, हे मी मान्य करतो. पण तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार आहात? पण तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रात २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के मतदारांची (२७,०६५) वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तेथे निवडणूक जिंकली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“उत्तर नागपुरात मतदारांमध्ये ७ टक्के (२९,३४८) वाढ झाली आणि काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे १० टक्के (५०,९११) मतदारांची वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिममध्ये ११ टक्के (३८,६२५) मतदारांची वाढ झाली आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये मतदारांमध्ये ९ टक्के (४६,०४१) वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“जर मित्रपक्षांबरोबर नाही तर त्यांनी या ट्विटपूर्वी एकदा त्यांच्याच पक्षातील अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारख्या नेत्यांशी बोलले असते तर बरं झालं असतं. किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी काय आरोप केले होते?

राहुल गांधी यांनी दावा केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले होते. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी न्यूजलॉन्ड्री या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात (दक्षिण-मध्य नागपूर) शेवटच्या पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढले आहेत, तर, काही बूथवर २० ते ५० टक्के मतदार वाढले, असा दावा केला आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in