2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोकल विलंबाला कंटाळून बदलापुरातील प्रवासी रूळांवर

बदलापूरः आधीच गर्दीने आणि स्थानकातील अडचणींने त्रस्त असलेल्या बदलापुरकर प्रवाशांना लोकल विलंबाचा फटका बसतो आहे. सकाळी ५ वाजून २५ मिनिटांची लोकल दररोज २० ते २५ मिनिटे उशिराने येत असल्याने शनिवारी प्रवाशांनी रेल्वे रूळांवर उतरून आणि नंतर स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. दररोज होणाऱ्या लोकल विलंबामुळे कार्यालयात उशिराचा शेरा लागत असून कारवाईचे सावट गडद झाल्याची प्रवाशांची भावना होती.

लोकल प्रवासातील अडथळ्यांची शर्यत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात बदलापुरकर प्रवाशांना त्याचा सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. सकाळच्या सत्रातील लोकल उशिराने धावत असल्याने बदलापुरकर प्रवाशांना दररोज कार्यालयात उशिराचा शेरा बसतो आहे. याविरूद्ध सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही लोकलविलंब सुरू असल्याचे दिसून आले आहे. या लोकल विलंबावरून शनिवारी बदलापूर स्थानकातील काही प्रवाशांनी संताप व्यक्त करत स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात प्रवेश करत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याच वेळी काही प्रवाशी संताप व्यक्त करत रेल्वे रूळांवरही उतरले.

बदलापूर रेल्वे स्थानकातून सकाळी तीन वाजल्यापासून लोकल गाड्या मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरूवात होते. त्यातील सुरूवातीच्या चार लोकलगाड्या या कर्जत स्थानकातून सुटतात. यात ३ वाजून ३ मिनिटांची, ४ वाजून ७ मिनिटांची, ५ वाजताची आणि ५ वाजून २५ मिनिटांची लोकल कर्जतहून सुटते. तर ५ वाजून ४० मिनिटांची पहिली लोकल मुंबईसाठी बदलापूर स्थानकातून सुटते. या ५ वाजून २५ मिनिटांची आणि त्यानंतरची ५ वाजून ४० मिनिटांची लोकल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशिराने धावत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शनिवारीही ही लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला. परिणामी प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापक यांचे कार्यालय तसेच रेल्वे रूळावर उतरून संताप व्यक्त केला.

रोजच्या उशिरामुळे कार्यालयात जाण्यास उशिर होतो आहे. त्यात अनेक प्रवासी हे आपातकालीन विभागात कार्यरत असतात. रूग्णालये, शाळा, वाहतूक विभाग अशा विभागातील कर्मचाऱ्यांच्या उशिरा जाण्याने पुढील यंत्रणेवर परिणाम होतो. तर अनेक ठिकाणी बायोमेट्रीक हजेरी असल्याने त्यावर कायमच लेट मार्क किंवा हाफ डे लागत असल्यानेही कर्मचारी संताप व्यक्त करतात. त्यामुळे दररोजचा उशिराचा शेरा एक दिवस नोकरी घालवेल की काय अशी भीती वाटत असल्याची भावना रेल्वे प्रवासी व्यक्त करत होते.

गर्दी वाढते आणि धोकाही

एक लोकल गाडी दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा अधिक काळ उशिराने आल्यास त्या लोकलच्या नंतरच्या लोकलचे प्रवासीही फलाटात येऊन थांबतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी स्थानकात होत असते. उशिरा आलेल्या लोकलचे प्रवासी आणि त्यामागचे प्रवासीही लोकलमध्ये शिरतात. त्यामुळे फलाटात आणि लोकलमध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे पुन्हा मुंब्र्यासारखी घटना घडायची भिती वाटते अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in