मुंबई : भाजप विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याने आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. बुधवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळामध्ये गटनेतेपदी निवड झाली आहे. फडणवीसांची गटनेता म्हणून निवड झाल्यावर आपल्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले. जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली असून महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकमताने विधीमंडळ गटाचा नेता म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार. यावेळची निवडणुक अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर ठेवली आहे ती म्हणजे ‘एक है तो सेफ है’ आणि ‘मोदी है ते मुनकीन है’. मोदींच्या नेतृत्त्वामध्ये विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारंच मँडेट जनतेने आपल्याला दिलं आहे. आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्रपक्षांचे आभार. आपण ज्या संविधानाच्या प्रक्रियेतून निवडून येतो या संविधानाची ७५ वर्षे पू्र्ण होत आहेत. मोदी कायम सांगतात कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचे संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जनतेने मोठा जनादेश दिला आहे. आता या जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली आहे. सगळ्यांनी दिलेल्या जनादेशाचं सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.












