मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिघांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. शिंदेंनी याबद्दलचा सस्पेन्स आजही कायम ठेवला.
‘एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, राज्याच्या हितासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेचे आमदारदेखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यांना याबद्दल मी विनंती केली आहे. याविषयीचा निर्णय ते संध्याकाळपर्यंत घेतील. ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे असणार की नाही हा प्रश्न कायम राहिला.
अजित पवारांच्या विधानावर सारेच हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधत चौकार मारला. ‘दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,’ असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा हशा पिकला. शिंदेंच्या टोल्यानंतर पुन्हा एकदा दादा बोलले. ‘आम्ही दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. ते राहून गेलं होतं. आता पुढे ५ वर्षे राहणार आहोत,’ असं अजित पवार म्हणाले.












