मुंबई : मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून, शहरातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा कायम राहणार असून काही भागांत मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकण आणि घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दक्षिण मुंबई, मध्य उपनगर, आणि पश्चिम उपनगरातील काही भागांत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर होता. याचबरोबर पहाटेपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. दादर, वरळी, परळ, प्रभादेवी, भायखळा, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही आज पावसाची तीव्रता अधूनमधून वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आता पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोकण तसेच घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. याचबरोबर विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात पावसाचा जोर फारसा नसेल. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. त्यानंतर मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.












